आज देवबाभळी नाटक पाहिलं. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून पाहावं अशी अप्रतिम कलाकृती.
ह्या नाटकातल्या प्रत्येक बाजूला आवर्जून दाद द्यावीशी वाटते. नेपथ्य , ध्वनी , प्रकाशयोजना , संगीत , दिग्दर्शन , लेखन , अभिनय सगळ्यांचीच सांगड इतकी सुंदर घातली आहे कि प्रेक्षक मंत्रमुग्ध झाल्याशिवाय राहात नाही.
तीनही कलाकार सुरेल गातात.
तशी ह्या नाटकात प्रत्यक्ष दोन पात्र आहेत रखुमाई आणि तुकारामाची पत्नी - आवली , पण दोनही कलाकार इतक्या ताकदीने नाटक सादर करतात कि त्यातली बाकीची पात्र विठुराया , तुकाराम महाराज आणि इंद्रायणी नदी , सहजतेने रंगमंच व्यापतात.
एकीकडे रखुमाई , दैवी स्त्री आणि दुसरीकडे सामान्य आवली. पण शेवटी दोघींच्या भावना समान. बाईच्या मनातल्या , खासकरून एका बायकोच्या भावना , त्रागा , पीडा , अगतिकता , काळजी , दोहींच्या हि सारख्याच.
रखुमाईना खुपणारी राधा किंवा जनाबाई किंवा आवळीला खुपणारा विठ्ठल ... खुपणं सारखाच.
आवली ने विठोबाच्या नावाने खडे फोडले कि रखुमाईला येणारा राग आणि सावकारकीचे कागद इंद्रायणीत सोडून ज्यांना कर्जमुक्त केलं त्यांनीच तुकारामाची निंदा केल्यावर आवली चा राग .. सारखाच
दोनही बायकांना खुपलेला (देवबाभळीचा ) काटा आणि त्याच दुःख सारखाच.
-- मीता मेहेर
०८-०७-२०२५